हिंजवडीत साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी धारेवर   

लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि आयटीयन्स यांच्याकडून संयुक्त पाहणी  

पिंपरी : पहिल्याच पावसात आयटीनगरी तुंबली. पाऊस पडताच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येत असल्याने लाखो आयटीयन्स वेठीस धरले जातात. आयटीनगरीतील विविध समस्या जाणण्यासाठी हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या अधिकार्‍यांसह आयटीयन्स व लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी दौरा केला.
 
एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आदी विभागांचे अधिकारी, हिंजवडी, माण, मारुंजी या गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, स्थानिक, नागरिक, आयटीयन्स संघटनांचे पदाधिकारी व काही आयटीयन्स यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी व स्थानिक ग्रामस्थ व आयटीयन्सनी अधिकार्‍यांना खडे बोल सुनावत चांगलेच धारेवर धरले. तर विविध गावांच्या सरपंचांनी वाहतूक, कचरा, पथदिवे, पर्यायी रस्त्यांची रखडलेली कामे, आणि मेट्रो प्रकल्पाला गती यासह अन्य समस्या सोडवण्याबाबत गार्‍हाणे मांडले.  हिंजवडी-माण परिसरातील पाणी साठणार्‍या गवारे मळा, डॉलर कंपनी परिसर, हिंजवडी-माण शिवेवरील ओढा, दि कॉडर्न कंपनी आदी ठिकाणांची संयुक्त पाहणी करून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. यावेळी भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, एमआयडीसी वानखेडे, हिंजवडी वाहतूक विभागाचे प्रसाद गोकुळे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, सोमाजी खैरे, तुळशीराम रायकर आदी उपस्थित होते.वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी तसेच अन्य विभागांचे अधिकारी कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. त्यांना येथील समस्यांचे कसलेही गांभीर्य नाही, असा आरोप करत हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठकीत अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. जांभुळकर यांनी आजवर केलेल्या हजारो पत्रांचा गठ्ठाच सर्वांसमोर ठेवला. समस्यांची तुम्हाला जाण नसेल. तळमळ नसेल. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून लोक आम्हाला फैलावर घेतात, जाब विचारतात असेही त्यांनी सुनावले.
 

Related Articles